नवी दिल्ली: विराट कोहली आणि रोहित शर्मा हे जागतिक क्रिकेटमधील दोन असे खेळाडू आहेत, ज्यांच्या नावावर चाहते आणि क्रिकेटचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र, २०२४ च्या टी-२० विश्वचषक विजयानंतर या दोघांनी अचानक टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खेळण्याचे त्यांचे स्वप्नही २०२५ मध्येच संपुष्टात येऊ शकते, अशा चर्चांना उधाण आले आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, बीसीसीआयच्या भविष्यातील योजनेत हे दोन्ही खेळाडू बसत नसल्याने त्यांचे वनडे करिअर धोक्यात आले आहे.

विराट कोहली -रोहित शर्माच्या वनडे करिअरवर चर्चेला सुरुवात कशामुळे झाली?
‘दैनिक जागरण’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, यावर्षी ऑक्टोबर महिन्यात होणारी भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका ही कोहली आणि रोहितची शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका ठरू शकते. बीसीसीआय २०२७ च्या विश्वचषकासाठी एक नवी आणि तरुण संघबांधणी करण्याच्या तयारीत आहे. या योजनेत हे दोन्ही दिग्गज खेळाडू बसत नसल्याने त्यांना निवृत्ती घ्यावी लागू शकते, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
अहवालानुसार, जर कोहली आणि रोहितला संघात स्थान कायम ठेवायचे असेल, तर त्यांना देशांतर्गत क्रिकेटमध्ये (विजय हजारे ट्रॉफी) आपला फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करावा लागेल. यापूर्वी कसोटी निवृत्तीच्या आधीही दोघांना रणजी ट्रॉफी खेळण्याची अट घालण्यात आली होती, मात्र त्यानंतर त्यांनी अचानक निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा बीसीसीआयच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुढील ६ सामने ठरणार ‘करो या मरो’
सूत्रांच्या माहितीनुसार, विराट आणि रोहितचे आंतरराष्ट्रीय भवितव्य विजय हजारे ट्रॉफीवर नाही, तर त्यापूर्वी होणाऱ्या ६ एकदिवसीय सामन्यांवर अवलंबून असेल. भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळेल. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामने खेळेल.
या सहा सामन्यांमध्ये जर कोहली आणि रोहितने दमदार कामगिरी केली, तर त्यांच्या संघातील जागेला कोणताही धोका नसेल. मात्र, जर ते या सामन्यांमध्ये अपयशी ठरले, तर बीसीसीआयच्या नियमानुसार त्यांना विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळावे लागेल.
‘विजय हजारे’मधील पेच आणि बीसीसीआयचा ‘प्लॅन बी’
खरी अडचण इथेच सुरू होते. ज्यावेळी विजय हजारे ट्रॉफी (२४ डिसेंबर ते १८ जानेवारी) सुरू असेल, त्याच दरम्यान भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. अशा परिस्थितीत, जर कोहली आणि रोहित विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळले, तर ते न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला मुकतील. त्यावेळी त्यांच्या जागी खेळणाऱ्या युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यास, या दिग्गज खेळाडूंचे संघातील पुनरागमन जवळजवळ अशक्य होईल.
हाच पॅटर्न त्यांच्या कसोटी निवृत्तीवेळीही दिसला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर त्यांना रणजी खेळायला लावले आणि त्यानंतर त्यांनी निवृत्ती घेतली. त्यामुळे, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिका त्यांच्यासाठी अखेरची संधी मानली जात आहे.
बीसीसीआयची नवी टीम बनवण्यावर भर
बीसीसीआयने यापूर्वीच टी-२० आणि कसोटीमध्ये यशस्वीपणे स्थित्यंतर घडवले आहे. सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे टी-२० आणि कसोटीत नव्या संघाची बांधणी झाली आहे. आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही २०२७ च्या विश्वचषकापूर्वी नवी टीम तयार करण्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांनी यावर थेट बोलणे टाळले असले तरी, या सहा सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करूनच विराट आणि रोहितला संघातील आपली जागा वाचवता येणार आहे, हे मात्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, २०२७ चे स्वप्न पाहणाऱ्या या दोन्ही महान खेळाडूंचे भवितव्य आता त्यांच्याच बॅटवर अवलंबून आहे.