मुंबई : राज ठाकरेंचा सरकारला इशारा

मीरा-भाईंदर, महाराष्ट्र – “महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांवर हिंदीची सक्ती करण्याऐवजी सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्यावर लक्ष केंद्रित करावे,” असा खणखणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मीरा-भाईंदर येथे एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी भाषा, अस्मिता आणि राज्याच्या राजकारणावर परखड भाष्य केले.

 

 

 

 

“मीरा-भाईंदरमधील घटना किरकोळ, पण…”

 

मीरा-भाईंदरमधील एका मिठाई विक्रेत्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून सुरू झालेल्या वादावर बोलताना ठाकरे म्हणाले की, “ही घटना किरकोळ होती, पण त्याला राजकीय रंग देऊन वातावरण तापवण्यात आले. मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना योग्य उत्तर मिळेलच. केवळ राजकीय दबावाखाली येऊन बंद पुकारणाऱ्या व्यापाऱ्यांनी लक्षात ठेवावे की महाराष्ट्रात राहायचे असेल, तर मराठीचा सन्मान करावाच लागेल.”

“आमचा कोणाशीही वाद नाही, पण जर कोणी मस्ती करणार असेल, तर त्याला ‘महाराष्ट्राचा दणका’ बसणारच,” असा इशाराही त्यांनी दिला.


 

 

 

 

हिंदी सक्ती आणि सरकारची भूमिका

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करणारच” या वक्तव्याचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, “सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी खुशाल करावी. केवळ आमच्या मोर्चाच्या धसक्याने आधीचा निर्णय मागे घ्यावा लागला होता. आता पुन्हा प्रयत्न करून बघा, आम्ही फक्त दुकानेच नव्हे, तर शाळाही बंद पाडू.”

“महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीसाठी भांडण्याऐवजी हिंदीसाठी का लढतोय? कोणाच्या दबावाखाली हे सर्व सुरू आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


 

“मुंबई तोडण्याचा डाव”

 

ठाकरे यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप केला. “गुजराती व्यापारी आणि नेत्यांचा मुंबईवर डोळा आहे. अगदी सरदार वल्लभभाई पटेलांनीही मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध केला होता. आता हिंदी भाषेच्या आडून हळूहळू मुंबई ताब्यात घेण्याचा आणि गुजरातला जोडण्याचा हा डाव आहे. अमराठी मतदारांचे मतदारसंघ तयार करून येथील स्थानिक मराठी माणसाला बाहेर फेकण्याचा हा कट आहे,” असे ते म्हणाले.


 

भाषेचे महत्त्व आणि ‘हिंदी’चा इतिहास

 

“तुमची भाषा मेली आणि पायाखालची जमीन गेली की तुमची ओळख संपते,” असे सांगत ठाकरे यांनी मराठी भाषेच्या महत्त्वावर जोर दिला. “मराठीला अडीच ते तीन हजार वर्षांचा समृद्ध इतिहास आहे, तर हिंदी केवळ २०० वर्षे जुनी भाषा आहे. अशा भाषेला आमच्या मुलांवर लादण्याचे कारण काय?”

“उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानसारख्या हिंदी भाषिक राज्यांतील लोकांना नोकरीसाठी महाराष्ट्रात यावे लागते. जर हिंदीमुळे विकास झाला असता, तर त्यांना आपली राज्ये सोडून बाहेर पडावे लागले नसते,” असेही ते म्हणाले.


 

“आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही!”

 

आपल्या भाषणाचा समारोप करताना ठाकरे म्हणाले, “आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली जर कोणी मराठी भाषा संपवायला येत असेल, तर माझ्यासारखा कडवट मराठी माणूस तुम्हाला सापडणार नाही.”

त्यांनी सर्व मराठी लोकांना दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त मराठी बोलण्याचे आवाहन केले. “दुकानात, बसमध्ये, टॅक्सीत, कुठेही जा, समोरच्याशी मराठीतच बोला. त्याला मराठी बोलायला भाग पाडा. तुम्ही खंबीर राहिलात तर कोणीही तुमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणार नाही. सतर्क राहा, आपला महाराष्ट्र आणि आपली भाषा टिकवा,” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed