लंडन: ओव्हलच्या मैदानावर झालेल्या थरारक कसोटी सामन्यात, मोहम्मद सिराजच्या अविस्मरणीय गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडच्या जबड्यातून विजय खेचून आणला आहे. शेवटच्या दिवशी विजयासाठी केवळ ३५ धावांची गरज असलेल्या इंग्लंडला भारताने ६ धावांनी पराभूत करत पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. एका क्षणी सामना पूर्णपणे गमावलेल्या भारतासाठी सिराज संकटमोचक ठरला आणि त्याने केलेल्या कामगिरीमुळे भारताच्या ९५ वर्षांच्या कसोटी इतिहासातील सर्वात कमी धावांनी मिळवलेला हा विजय ठरला आहे.
India vs England (भारत vs इंग्लंड) थरारक शेवटच्या दिवसाची कहाणी
पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंडला विजयासाठी ३५ धावा आणि भारताला ४ गडी बाद करण्याची गरज होती. जेमी ओव्हरटनने दिवसाच्या सुरुवातीलाच दोन चौकार मारून इंग्लंडचा विजय निश्चित मानला जात होता. पण त्यानंतर जो चमत्कार घडला, तो क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.
मोहम्मद सिराजने प्रथम जेमी स्मिथला बाद करून भारताला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. त्यानंतरच्या षटकात त्याने धोकादायक ओव्हरटनला पायचीत पकडले. सामना अचानक फिरला होता. यानंतर प्रसिद्ध कृष्णाने एका भेदक यॉर्करवर जोश टंगचा त्रिफळा उडवत इंग्लंडला नववा धक्का दिला. इंग्लंडला विजयासाठी अवघ्या ६ धावांची गरज असताना, सिराजने एका अचूक यॉर्करवर गस ऍटकिन्सनला त्रिफळाचीत केले आणि भारताच्या अविश्वसनीय विजयावर शिक्कामोर्तब केले.
‘खलनायक’ ते ‘नायक’: मोहम्मद सिराजचा अविश्वसनीय प्रवास
विशेष म्हणजे, सामन्याच्या चौथ्या दिवशी हॅरी ब्रुकचा सोपा झेल सोडल्यामुळे सिराजवर प्रचंड टीका झाली होती. त्यावेळी अवघ्या १९ धावांवर असलेल्या ब्रुकने नंतर १११ धावांची शतकी खेळी करत सामना भारतापासून दूर नेला होता. मात्र, त्याच सिराजने शेवटच्या दिवशी अवघ्या एका तासात ३ बळी घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याने या सामन्यात एकूण ९ बळी घेतले आणि त्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक:
- भारत (पहिला डाव): २२४/१० (करुण नायर ५७; गस ऍटकिन्सन ५/३३)
- इंग्लंड (पहिला डाव): २४७/१० (जॅक क्रॉली आणि हॅरी ब्रुक यांची अर्धशतके; मोहम्मद सिराज ४/७५, प्रसिद्ध कृष्णा ४/८०)
- भारत (दुसरा डाव): ३९६/१० (यशस्वी जैस्वाल ११८, आकाशदीप ६६; जोश टंग ५/९०)
- इंग्लंड (दुसरा डाव): ३६७/१० (हॅरी ब्रुक १११, जो रूट १०५; मोहम्मद सिराज ५/८५, प्रसिद्ध कृष्णा ३/९५)
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतरची ही पहिलीच कसोटी मालिका होती. मालिकेत २-१ ने पिछाडीवर पडलेल्या युवा भारतीय संघाने हा विजय मिळवून केवळ मालिका बरोबरीतच आणली नाही, तर भविष्यासाठी एक नवा आत्मविश्वास देखील संपादन केला आहे.